अंबरनाथ : ‘ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा जिल्हा असून, या जिल्ह्यात सर्वाधिक ताकद निर्माण करायची आहे. कितीही अपयश आले, पडझड झाली, तरी त्याने खचून न जाता आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळवायचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
पालघर, वसई-विरार, भाईंदर येथे यशस्वी मेळावे घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांची पहिला कार्यकर्ता मेळावा ठाणे ग्रामीणमधील अंबरनाथमध्ये नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार पाटील यांनी पक्षाचा आढावा घेताना पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापनही केले. शिवाय यापुढे बुथ कमिट्या कशापद्धतीने सक्षम करावयाच्या आहेत हे सांगतानाच कामाचा मूलमंत्रही कार्यकर्त्यांना पाटील यांनी दिला.
‘भविष्यकाळ हा राष्ट्रवादीसाठी आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील १२ आमदार पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी काम करा,’ असा सल्ला माजी मंत्री गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिला.
या मेळाव्यात इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावेळी प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्वागत केले.
या कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, शहापूर आमदार पांडुरंग वरोरा, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, माजी आमदार गोटीराम पवार, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, शहराध्यक्ष सदाशिव पाटील, कॅप्टन आशिष दामले, गुलाबराब करडुलेपाटील आदींसह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, युवतीप्रमुख, युवक उपस्थित होते.